Friday, April 24, 2026

चिमुकल्या तुझ्या हातामध्ये धरलेले माझं बोट सोडवून घरी गेले मी जेव्हा तेव्हा भारावले होते रे
माझ्या हजारो आर्जवांना अखेर मिळाले होतं तुझं मूर्त रूप.. गोंडस, गोजिरं, निरागस 
आई बाबा असतातच ना नेहमी पाठीशी आपल्या, पण त्यांची साथ टिकवायची म्हटली तरी टिकते का आयुष्यभर?
निसर्गाचा नियमच आहे तो, भल्याभल्याना चुकला नाही जो नेम त्याला आपण पामर काय बदलणार?
पण आता तू होतास, माझा, कायमचा.. आयुष्यभर तू राहणार होतास माझा पाठीराखा.. अगदी शेवटपर्यंत 
मी कधीच अनाथ नव्हते होणार आता, कधीच एकटी नव्हते पडणार, कधीच माहेर तुटणार नव्हते माझं 
कारण आता तू होतास.. 

तुझ्यामाझ्यात अंतरच इतके होते की ताईबरोबर बरेचदा आईही झाले तुझी मी 
कधी भांडले, कधी चिडले, रागावले, कधी मारलेही असेल, पण जीव ओवाळलाही तुझ्यावरच ना? 
तुझ्या बाललीलांचं अप्रूप हि केलं, तू अडलास तेव्हा मार्गदर्शनही केलं, तू चुकलास तेव्हा हटकलं देखील 
पण तुझा हात झटकला नाही कधीच कारण तुझ्याशिवाय माझं असणं अपूर्ण होतं.. 
तू होतास म्हणून तर त्या बाललीला होत्या, त्या आठवणी होत्या, हसणं रडणं चिडणं होतं 
आणि तू तर नेहमीच होतास.. 

प्रतिपदेला आकाशात पाहिलेली कोर अचानक एक दिवस पूर्णत्वाला जाऊन टेकते 
आपल्या लक्षातच नाही येत कधी वाढत गेली ती कलेकलेने ते 
तसेच झाले रे.. माझं बोट धरून चालता चालता कधी तू तुझा हात दिलास कळलंच नाही 
कधी मी तुझ्यात आधार शोधायला लागले आणि कधी आपलं नातं मैत्रीकडे झुकलं आठवतच नाही आहे 
पण ते घडलं.. आणि खूप आवडलं मला ते ही .. आपलं मित्र बनणं 
कारण आता तू माझा मित्रही होतास... 

नेहमी तुझ्याकडे बघताना प्रेमळ चेहरा दिसला रे मला, त्यामागं काहीतरी विद्रूपही होतं हे कळलंच नाही कधी 
तुला घडवणाऱ्या हातांमध्ये छोटेसे असले तरी माझेही दोन हात होतेच की 
मग एका सुंदर शिल्पाचं स्वप्न बघता बघता आम्ही कसे काय कोरले हे संहारणारे हात? 
तुझ्या हातांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात माझाही वाटा आहेच म्हणजे कुठे तरी?
अपराधी केलंस रे तू मला आज.. माझ्याच नजरेतुन उतरून गेले मी.. 
ज्याक्षणी हात उगारलास तू तिच्यावर पहिल्यांदा.. अनेक सुंदर नाती चुरगाळून टाकलीस  तू ..
आणि अनवधानानं घडलेली असती ही चूक तर कदाचित समजूनही घेतले असते मी..
पण तू करतच राहिलास ही चूक.. वारंवार.. आणि वर समर्थनही करत राहिलास आपल्या वागण्याचं 
आता मी आहे, ती आहे, तू ही आहेस.. पण माझा नाही वाटत  तू मला ... 
माझा तू असा असूच शकत नाहीस.. 
माझ्या असण्याला पेलणारा एक स्तंभ कोसळून गेला रे अचानक.. मला अपूर्ण केलंस तू 
मला आणि तुझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अनेकांना.. 
माझ्यानंतरही माझ्या मुलांच्या डोक्यावर मायेचं छत्र केवळ तूच धरू शकतोस असा विश्वास होता मला
तो विश्वासही गळून पडला आज..
आता तू आहेस, पण केवळ आहेस... माझा नाहीस.. 




Wednesday, January 23, 2019

जाऊ नको ना

जाऊ नको ना साथ सोडूनी, अर्धी वाट ही नाही सरली
जपण्यासाठी आठवणींची, ओंजळ अजूनही नाही भरली
हातामध्ये हात घेउनी, चालत होतो सोनकिनारी
वाळूमधली पाऊलांची ती, रांगोळीही नाही पुसली
जाऊ नको ना.....
क्षणात आहे क्षणात नाही, क्षणात आटली जीवनधारा
क्षणाक्षणाला भास तुझा, एक क्षणाचा खेळ हा सारा
क्षणभंगुर त्या भातुकलीचा, गेला मोडूनी डाव नियारा
पुन्हा मांडूया तीच चूल अन, अंगत पंगत तोच पसारा
जाऊ नको ना......
आठवते मज आज पुन्हा ते, वेडे भांडण पावसातले
ओल्या मातीच्या गंधाने, भिजवून गेले चुंबन पहिले
गंध तोच अन कोसळणारा, तोच असे रे पाऊस ओला
ये ना घे ना कवेत फिरुनी, घाबरा होई जीव एकला
जाऊ नको ना.... ऐक ना रे.. जाऊ नको ना....




Monday, June 25, 2018


कोसळतोय वळीव खिडकीबाहेर
तडतडत आहेत तावदानावर त्याचे टपोरे थेंब
अंगणात साचलेलं तळ जगतेय त्याचे क्षणभंगुर अस्तित्व
गेटबाहेर उभी आहे माझी बाईक एकटीच
तिलाही सवय झाली आहे आता एकट्याने भिजायची
आठवतेय तीही पावसात चढलेला पन्हाळ्याचा घाट
आणि आपण दोघे चिंब भिजलेले.. प्रेमात
तबक उद्यानाबाहेरची गरमागरम भजी
आणि कॉफीत बुडवून खाल्लेली ती बिस्किटे ग्लुकोजची
आजही उभा आहे मी खिडकीच्या ह्या बाजूला
हातात कॉफीचा कप घेऊन
आजही कोसळतोय वळीव डोळ्यातून
आणि मनात साचलेलं तळ आजही वाट बघतेय
एखादे प्रतिबिंब त्यात उमटण्याची
नि ह्या प्रतिक्षेत सगळेच आहोत आम्ही... एकटे..
ते तळ, ती बाईक, ती कॉफी आणि मीही







Friday, April 13, 2018

मी

रोम रोम पेटतो पण काया होते बंदिनी
आर्त मन हे साद देई पाय गेले जखडूनी
कोण घाली बंधने मज, का अशी कमजोर मी
वागले जर मुक्त मग का भासते मज स्वैर मी
तो म्हणे अन ती म्हणे हे खेळ मनचे वाहूनी
मीच कारावास रचला, कैद ही झालेच मी
घे भरारी ग नभी बेड्या मनीच्या तोडूनी
मुक्त हो स्वच्छंद हो निर्बध सारे झटकूनी
मोल स्वत्वाचे कळावे, घ्यावे मज मी व्यापूनी
लख्ख प्रतिमा ही पाहावी आज व्हावे मीच मी
आज व्हावे मीच मी....




Friday, February 16, 2018


आणखी काही कविता...

दर्या -

लाख लाटा लाख मोती
लाख शंखांचीहि गणती
विश्व अवघे दर्यात जनती
अमृतासवे विषही वसती

===================

बाबा -

पियुषासाठी हरेक लढतो
जहर पितो एक नीळकंठ तो
विष पचवूनी विश्व घडवतो
सुष्ट रक्षण्या रौद्र ही होतो
क्षणात तांडव क्षणात शमतो
क्षणात गंगा पाझर स्त्रवतो
भस्म, जटा अन चर्म लेवुनी
कृपावृष्टि जगतावरी करितो
जगत् पिता तो महादेव पण
एक सांब मम वसनि वसतो
अंश जणू त्रैमूर्तीचा अन
मम विश्वाचा विश्वकर्मा तो

Tuesday, May 16, 2017


ही कविता माझ्या लाडक्या लेकीसाठी -


छोट्या छोट्या पावलांनी चाल राणी वाट नवी
छोट्या छोट्या डोळ्यांमध्ये स्वप्नं मात्र मोठी हवी
छोट्या तुझ्या हातांनी ह्या घडव गं नवं जग
ओळख तुझी तिथे फक्त माणूस असेल, एवढं बघ

देवीपण नको तुला, चुकण्याची हवी मुभा
त्यागाचे पोवाडे नको, जगण्याची घ्यावी मजा
घरची तू परी जरी, पंख गरुडाचे तुझे
घे भरारी उंच नभी, पल्याड जा तू क्षितीजाच्या

रेशमी हे केश काळे, नाक जणू चाफेकळी
मदमस्त डोळे नशिले, ओठ गुलाब पाकळी
नव्हेसच तू कवितांमधली, अशी कचकडी बाहुली
शक्ती बुद्धी समृद्धी तू, लक्ष्मी दुर्गा आणि काली

ना तू सखी ना साजणी, ना निर्भया ना दामिनी
ना तू माता नाही जननी, ना प्रिया अन नाही पत्नी
रक्षेसाठी विनवणारी नाहीसच तू अबला भगिनी
गरज तुला ना ह्या बिरुदांची, ओळख असू दे 'व्यक्ती' म्हणूनी
केवळ एक व्यक्ती म्हणूनी...


Saturday, March 25, 2017

शिवाजी महाराज - आग्र्याहून सुटका - For Kids annual day performance

@copyright manogate.blogspot.com - Do not use without permission


१. नमस्कार मंडळी. आज पहिलीचा वर्ग तुम्हाला शिवाजी महाराजांची एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला महाराजांच्या हुशारीची, चातुर्याची आणि धूर्तपणाची कल्पना येईल. शिवरायांनी मुरारबाजींच्या मृत्यूनंतर पुरंदरला राजा जयसिंगबरोबर तह केला. जयसिंगाने त्यांना औरंजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला येण्याचे आमंत्रण दिले. शिवाजी, संभाजी, हिरोजी फरजंद, मदारी मेहतर आणि इतर सरदारांबरोबर आग्र्याला गेले. पण औरंगझेबाने दरबारात त्यांचा अपमान केला आणि त्यांना नजरकैदेत ठेवले.

२. शिवरायांनी  औरंझेबाचा डाव ओळखला होता. शिवरायांना अफगाणिस्तानात कैद करून मराठी राज्यावर कबजा करायचा त्याचा इरादा होता. शिवरायांनी औरंगझेबाला सांगितले "आता तर मी तुमचा कैदी आहे. मला काय करायचेय हे सैन्य? माझ्या सरदारांना आणि सैन्याला परत पाठवून  द्या. मी, संभाजी, हिरोजी, मदारी इथे राहू." औरंझेबाला वाटले "बरे झाले, सैन्य गेल्यावर शिवाजी एकटा पडेल." त्याने लगेच सैन्याला परत पाठवायचा हुकूम दिला.

३. चला पहिली पायरी पार पडली. सैन्याला परत पाठवण्यामागे शिवबांचा गनिमी कावा होता. पण आता फौलाद खान आणि मुघल सैनिक सतत महाराजांवर पहारा ठेवून होते. सैन्य परत गेल्यावर थोड्या दिवसांनी शिवबांनी आजारी पडल्याचे नाटक केले. महाराज दिवस रात्र त्यांच्या खोलीतच झोपून राहू लागले. मदारी आणि हिरोजी त्यांची काळजी घेत होते. अनेक वैद्य, हकीम येऊन महाराजांना बघून जात. पण महाराजांची तब्येत काही बरी होईना.

४. इकडे शिवनेरीवर जिजामाता खूप चिंतेत होत्या. महाराजांच्या गैरहजेरीत त्याच राज्यकारभार बघत होत्या. शिवबा तर कैदेत होताच, पण त्याबरोबर जिजाऊंचा शंभू बाळ पण कैदेत होता. संभाजी महाराज तेव्हा फक्त ९ वर्षाचे होते. इतक्या लहान वयात घरापासून दूर, जिजाऊपासून दूर शत्रूच्या राज्यात अडकले होते. पण त्यांना भीती वाटत नव्हती. आपले बाबा आपल्याला इथून सोडवून नेतील ह्याची त्यांना खात्री होती.

५. इकडे दिवसेंदिवस शिवबाची तब्येत बिघडतच चालली होती. आता शिवबांच्या पोटातही दुखू लागले. शेवटी महाराजांनी जयसिन्घ राजाला विनंती केली "बादशहाला सांगा, शिवाजी आता वाचत नाही. मला गोरगरिबांना अन्न, पक्वांन्ने वाटू द्या. त्यांच्या आशीर्वादाने मला बरे वाटले तर वाटले. " जयसिंघानी औरंझेबाला महाराजांची हि विनंती कळवली. हे ऐकून बादशहाला आनंदच झाला. त्याने लगेच दान-धर्म करायला होकार दिला.

६. रोज शिवबांच्या तंबूतून अन्नाचे, मिठाईचे अनेक पेटारे गरीबाना वाटायला जाऊ लागले. मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातून कित्येक पक्वाने महाराज पाठवत. फौलाद खान आणि त्याचे सैनिक ह्या पेटाऱयांची कसून तपासणी करत. हे असे २-३ महिने सुरु होते. हळू हळू सैनिक ही कंटाळले. "रोज रोज काय बघायचे ह्या पेटाऱ्यात ?" असा विचार त्यांनी केला. पेटारे तसेच बाहेर जाऊ लागले.

७. शिवबांना हेच तर हवे होते. एक दिवस शिवाजी महाराज आणि संभाजी दोन पेटाऱ्यात बसले. शिवबांच्या जागी हिरोजी झोपला. मदारी त्याचे पाय दाबायचे नाटक करू लागला. बाकी पेटाऱयांबरोबर हे पण पेटारे हमालांनी बाहेर नेले. महाराज कैदेतून निसटले. बाहेर महाराजांचे सरदार त्यांची वाटच बघत होते. महाराज आणि शंभू घोड्यावर बसून दक्षिणेला न जाता उत्तरेला मथुरेकडे निघून गेले. महाराज सहीसलामत सुटले..

८. दुसऱ्यादिवशी हिरोजी आणि मदारीने पलंगावर उश्या ठेवल्या, त्यावर पांघरूण  घातले आणि औषधाची बाटली घेऊन ते बाहेर पडले. बाहेर सैनिकांनी त्यांना हटकले. "महाराजांचे डोके दुखते आहे, औषध घेतो आणि लगेच परत येतो." असे म्हणून दोघेही तिथून पसार झाले. बराच वेळ कुणी परत आले नाही, खोलीतूनही काही आवाज येत नाही म्हटल्यावर सैनिकांनी खोलीत जाऊन पाहिले तर काय खोली रिकामी. फौलाद खान ला समजेना हे झाले कसे? शिवबा कसा पळाला?

९. बादशहाला हे कळल्यावर तो भयंकर चिडला. पण करणार काय? शिवबानी संभाजीला मथुरेत लपवून ठेवले, संभाजी मेला अशी खोटी बातमी पसरवली. आपली दाढी मिशी काढून त्यांनी बैराग्याचा वेष घेतला आणि लपत छपत ते शिवनेरीवर परत आले. २-३ महिन्यानंतर शंभू बाळ हि परतले. शंभूला जवळ घेऊन जिजाऊ म्हणाल्या, "बाळ तुम्ही तर खूप च धाडसी झालात. बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आलात." त्यावर संभाजी म्हणाला "आऊ तुरी नाही, मिठाई देऊन आलो"

reference - "शूर शिवबा" - धीरज नवलखे