Friday, February 24, 2006

काय हरवलंय?

आज वर्तमानपत्रात बातमी वाचली. आमची शाळा आता इंग्रजी माध्यमाची होणार. ही बातमी वाचली आणि उगाचच दुःख झाले. काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. दोनेक वर्षातून एकदा भारतात गेल्यावर एखादी चक्कर मारणे, एवढाच माझा सध्या शाळेशी संबंध राहिला आहे. आता तर आमच्यावेळचे बरेचसे शिक्षकदेखील निवृत्त झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. पण शाळेशी माझी नाळ जोडली गेली आहे त्याचं काय करणार? वयाच्या तिस~या वर्षापासून शाळा माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनली. मित्र-मैत्रिणी, शिक्षिका, शाळेतले इतर कर्मचारी.. सगळे माझ्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. कधी कुणाशी भांडण होई, कधी रागावल्या म्हणून बाईंचा राग येई, पण तरिही शाळा कधीच नकोशी वाटली नाही. आमच्याकडे प्रत्येक वर्गाची एकच तुकडी, मोजकीच मुलं असायची. त्यामुळं एकमेकांशी जवळीक खूप होती. खरं तर ते एक मोठं कुटुंबच होतं म्हणा ना. मागच्या वर्षी आमच्या ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ कोसळला, आमच्या शाळेच्या स्थापनकर्त्या गेल्या. शाळेची सूत्रं नवीन लोकांच्या हातात गेली. 'बदल' अस्तित्वाचा अनिवार्य हिस्सा आहे. जीवनाचा श्वासच.. आज ना उद्या शाळेच्या कार्यप्रणालीत बदल होणारच होता. आणि हा बदल तर चांगल्यासाठी होतो आहे. कितीही कटू वाटलं तरी मराठी माध्यमाच्या शाळांना भविष्य नाही हे सत्य आहे. हे सगळं माहित असूनही काहीतरी गमावल्याची ही भावना का? म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. तसं काहीतरी झालंय. का? का व्हावं असं?

Tuesday, February 21, 2006

भ्रष्ट मी

काही दिवसांपूर्वी ‘रंग दे बसंती’ पाहिला. तो चित्रपट कसा आहे, त्याचा शेवट योग्य होता की नाही, हिंसा भ्रष्टाचाराचे उत्तर असू शकते का ह्या वादांमध्ये मला सध्यातरी स्वारस्य नाही. पण त्या चित्रपटाने मला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून दिली हे मात्र खरं आहे. एखादी गोष्ट खटकली तरी “आपल्याला काय करायचंय?” ही आपली भूमिका तितकीच राष्ट्रविघातक आहे जितकी ते कृत्य करणा~याची वृत्ती. मग ते कृत्य लाखोंचा गैरव्यवहार असो की चालक परवान्यासाठी दिलेली १०० रुपयांची लाच.

मागच्या महिन्यात भारतात गेलो होतो. जाताना दिरासाठी होम थिएटर नेले होते. बरीच महाग वस्तू होती. अपेक्षेप्रमाणे विमानतळावर कस्टमच्या लोकांनी अडवले. त्यांना २० डॊलरची लाच देऊन आम्ही बाहेर पडलो. मी स्वतः ते कृत्य केले नाही, माझ्या नव~याने केले. माझा विरोध त्याने डावलला असता हे माहित होते म्हणून मी त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. पण तसा प्रयत्न मी करायला हवा होता हे मात्र नक्की. अजूनही मला बोच आहे मी एका गुन्ह्यात सहभागी झाले ह्याची. मी प्रयत्न केला असता आणि मग त्याने माझे ऐकायला नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण मी न लढता माघार घेतली. हा अक्षम्य गुन्हा होता. थोडक्यात मी भ्रष्टाचाराला हातभार लावला. माझ्या आयुष्यात इतक्या उघडपणे भ्रष्टाचार पाहण्याची ही पहिली वेळ. आणि मी ते केवळ पाहिले नाही तर त्यात सहभागी झाले. का?

परत आल्यावर हा चित्रपट पाहिला आणि गुन्ह्याची जाणीव आणखी तीव्र झाली. ह्यापुढे असे प्रसंग आले तर आपण वाकायचे नाही हे ठरवले आहे. “हे असंच चालायचं” असे म्हणून ह्या भ्रष्ट “सिस्टम”चा आपणही एक हिस्सा बनायचे नाही. २० डॊलरची लाच देत देत आमच्या जाणिवा इतक्या बोथट होतील की उद्या २० हजाराची लाच देतानाही मन कचरणार नाही. मग आम्ही आमच्या मुलांसमोर काय आदर्श ठेवणार? त्यांना कुठल्या तोंडानं सांगणार हे चूक आहे म्हणून. फ़क्त लाच न घेणे म्हणजे प्रामणिकपणा नव्हे, लाच न देणे हासुद्धा त्याचा महत्त्वाचा हिस्सा आहे.
असो. ह्या सगळ्यातून एक गोष्ट मात्र समजली की अजून तरी मी पूर्णपणे विसरले नाही आहे प्रामाणिकपणाचे धडे. योग्यायोग्यतेची थोडीफार जाणीव अजून शिल्लक आहे आणि चूक केल्यावर अजूनही आपलंच मन खातं आहे. थोडक्यात अजून निगरगट्ट व्हायला वेळ आहे तर.

Tuesday, February 14, 2006

प्रेमोत्सव

एकदा वपुंच्या एका कथेत वाचले होते "जीवनाचा उत्सव करावा", खर्डेघाशी करत, रडत खडत तर सगळेच जगतात, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवत, तो आनंद एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा करत जगणारे जीव आगळेच. आज १४ फ़ेब्रुवारी, व्ह॓लेंटाईन डे. प्रेम साजरा करण्याचा दिवस. आता हा दिवस साजरा करणे म्हणजे काहितरी आगळीक असावी असे वागत आहेत कित्येक राजकीय पक्ष. आत्ताच वाचले, दुकानात, बागेत, रस्त्यावर एकत्र फिरणार्या जोडप्यांना खोटे लग्न विधी करायला लावले काही धेडगुजरांनी, ज्यांनी नकार दिला त्यांना राखी बांधायला लावली, आता त्यांचे फोटो त्यांच्या घरी पाठवणार आहेत म्हणे. किती वेडेपणा आहे हा? त्या जोडप्यातले किती तरी लोक अगदी चांगले मित्र-मैत्रिणी असतील, काही जण नुसते ओळखत असतील एकमेकांना. बहिण-भाऊ आणि नवरा-बायकॊ ही २च नाती असू शकतात का मुलामुलींमध्ये? विशुद्ध मैत्री असेही काही असते हे माहित नसावे ह्या लोकांना बहुदा. कित्येकजण म्हणतात प्रेमासाठी असा दिवस कशाला राखून ठेवायला हवा? पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे हे, ह्या दिवसाचे बाजारिकरण होते आहे वगैरे वगैरे... पण मी म्हणते आपण जर वटपौर्णिमा साजरी करू शकतो, भाऊबीज-रक्षाबंधन साजरे करू शकतॊ तर हा दिवस का नाही? बाजारीकरणाचं म्हणाल तर ते कुठे नाही? दिवाळी असो, गणेशोत्सव असो, रंगपंचमी असो, कोणता सण आपण आज पारंपारिक पद्धतीनं साजरा करतोय? so called संस्कृतीरक्षकांनो, एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्याच्या ह्या सणाला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून डावलण्यापेक्षा आपल्या मुलांना श्लोक-स्तोत्र शिकवणे, त्यांच्याशी मराठीत बोलणे कमीपणाचे मानणार्या मम्मी-पप्पांना संस्कृतिचे धडे द्या, त्यांना आपल्या परंपरांची जाणीव करून द्या. त्याने जास्त संस्कृतिरक्षण होईल.

जाऊ दे.. माझे म्हणाल तर जीवनाचा उत्सव करायला मला आवडते. माझे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही सुवर्णसंधी निदान मी तरी गमावणार नाही आहे. ज्यांना ह्या दिवसाबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना आजच्या दिवशी हार्दीक शुभेच्छा!!

सत्ययुगाची चाहूल

काकांनी परवा जे काही सांगितले त्यात किती तथ्य होते कोण जाणे, पण ती कल्पना मात्र खूप आवडली मला. खरेच असेल का हा कलियुगाचा अंत? खरेच परतून येईल का सत्ययुग? काका म्हणाले, सोने शुद्ध करताना ते मुशीत तापवतात, मग त्यातल्या अशुद्धी वरती तरंगायला लागतात, त्या बाहेर काढल्या की जे उरते ते असते शुद्ध सोने. अगदी १००% खरे सोने. सध्या आपले जग ह्या मुशीत आहे. कलियुग संपतेय, त्यामुळे आता जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी सुनामी, वादळे, पाऊस, हिमवादळे सुरू आहेत, जगात सगळी उलथापालथ होते आहे. माणूस माणसाचा वैरी झाला आहे. सगळे जग सैरावैरा धावते आहे मनःशांतीच्या शोधात. पण ह्या सगळ्याचा अंत जवळ येतोय. आणखी काहिशे वर्षात सत्ययुग सुरू होईल. मानवता पुन्हा त्या शुद्ध रुपाला जाऊन पोहोचेल. अर्थात हे सगळे बघायला तुम्ही आणि मी नसणार म्हणा.,, कोण जाणे असू सुद्धा, पुनर्जन्म खरेच असेल तर असू सुद्धा, पण मी ह्या सोन्यातली अशुद्धी असेन तर? तर.. सत्ययुग तुम्हाला लखलाभ असो… मी आपली कलियुगाचीच मजा लुटावी म्हणते…