Saturday, March 25, 2017

शिवाजी महाराज - आग्र्याहून सुटका - For Kids annual day performance

@copyright manogate.blogspot.com - Do not use without permission


१. नमस्कार मंडळी. आज पहिलीचा वर्ग तुम्हाला शिवाजी महाराजांची एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला महाराजांच्या हुशारीची, चातुर्याची आणि धूर्तपणाची कल्पना येईल. शिवरायांनी मुरारबाजींच्या मृत्यूनंतर पुरंदरला राजा जयसिंगबरोबर तह केला. जयसिंगाने त्यांना औरंजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला येण्याचे आमंत्रण दिले. शिवाजी, संभाजी, हिरोजी फरजंद, मदारी मेहतर आणि इतर सरदारांबरोबर आग्र्याला गेले. पण औरंगझेबाने दरबारात त्यांचा अपमान केला आणि त्यांना नजरकैदेत ठेवले.

२. शिवरायांनी  औरंझेबाचा डाव ओळखला होता. शिवरायांना अफगाणिस्तानात कैद करून मराठी राज्यावर कबजा करायचा त्याचा इरादा होता. शिवरायांनी औरंगझेबाला सांगितले "आता तर मी तुमचा कैदी आहे. मला काय करायचेय हे सैन्य? माझ्या सरदारांना आणि सैन्याला परत पाठवून  द्या. मी, संभाजी, हिरोजी, मदारी इथे राहू." औरंझेबाला वाटले "बरे झाले, सैन्य गेल्यावर शिवाजी एकटा पडेल." त्याने लगेच सैन्याला परत पाठवायचा हुकूम दिला.

३. चला पहिली पायरी पार पडली. सैन्याला परत पाठवण्यामागे शिवबांचा गनिमी कावा होता. पण आता फौलाद खान आणि मुघल सैनिक सतत महाराजांवर पहारा ठेवून होते. सैन्य परत गेल्यावर थोड्या दिवसांनी शिवबांनी आजारी पडल्याचे नाटक केले. महाराज दिवस रात्र त्यांच्या खोलीतच झोपून राहू लागले. मदारी आणि हिरोजी त्यांची काळजी घेत होते. अनेक वैद्य, हकीम येऊन महाराजांना बघून जात. पण महाराजांची तब्येत काही बरी होईना.

४. इकडे शिवनेरीवर जिजामाता खूप चिंतेत होत्या. महाराजांच्या गैरहजेरीत त्याच राज्यकारभार बघत होत्या. शिवबा तर कैदेत होताच, पण त्याबरोबर जिजाऊंचा शंभू बाळ पण कैदेत होता. संभाजी महाराज तेव्हा फक्त ९ वर्षाचे होते. इतक्या लहान वयात घरापासून दूर, जिजाऊपासून दूर शत्रूच्या राज्यात अडकले होते. पण त्यांना भीती वाटत नव्हती. आपले बाबा आपल्याला इथून सोडवून नेतील ह्याची त्यांना खात्री होती.

५. इकडे दिवसेंदिवस शिवबाची तब्येत बिघडतच चालली होती. आता शिवबांच्या पोटातही दुखू लागले. शेवटी महाराजांनी जयसिन्घ राजाला विनंती केली "बादशहाला सांगा, शिवाजी आता वाचत नाही. मला गोरगरिबांना अन्न, पक्वांन्ने वाटू द्या. त्यांच्या आशीर्वादाने मला बरे वाटले तर वाटले. " जयसिंघानी औरंझेबाला महाराजांची हि विनंती कळवली. हे ऐकून बादशहाला आनंदच झाला. त्याने लगेच दान-धर्म करायला होकार दिला.

६. रोज शिवबांच्या तंबूतून अन्नाचे, मिठाईचे अनेक पेटारे गरीबाना वाटायला जाऊ लागले. मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातून कित्येक पक्वाने महाराज पाठवत. फौलाद खान आणि त्याचे सैनिक ह्या पेटाऱयांची कसून तपासणी करत. हे असे २-३ महिने सुरु होते. हळू हळू सैनिक ही कंटाळले. "रोज रोज काय बघायचे ह्या पेटाऱ्यात ?" असा विचार त्यांनी केला. पेटारे तसेच बाहेर जाऊ लागले.

७. शिवबांना हेच तर हवे होते. एक दिवस शिवाजी महाराज आणि संभाजी दोन पेटाऱ्यात बसले. शिवबांच्या जागी हिरोजी झोपला. मदारी त्याचे पाय दाबायचे नाटक करू लागला. बाकी पेटाऱयांबरोबर हे पण पेटारे हमालांनी बाहेर नेले. महाराज कैदेतून निसटले. बाहेर महाराजांचे सरदार त्यांची वाटच बघत होते. महाराज आणि शंभू घोड्यावर बसून दक्षिणेला न जाता उत्तरेला मथुरेकडे निघून गेले. महाराज सहीसलामत सुटले..

८. दुसऱ्यादिवशी हिरोजी आणि मदारीने पलंगावर उश्या ठेवल्या, त्यावर पांघरूण  घातले आणि औषधाची बाटली घेऊन ते बाहेर पडले. बाहेर सैनिकांनी त्यांना हटकले. "महाराजांचे डोके दुखते आहे, औषध घेतो आणि लगेच परत येतो." असे म्हणून दोघेही तिथून पसार झाले. बराच वेळ कुणी परत आले नाही, खोलीतूनही काही आवाज येत नाही म्हटल्यावर सैनिकांनी खोलीत जाऊन पाहिले तर काय खोली रिकामी. फौलाद खान ला समजेना हे झाले कसे? शिवबा कसा पळाला?

९. बादशहाला हे कळल्यावर तो भयंकर चिडला. पण करणार काय? शिवबानी संभाजीला मथुरेत लपवून ठेवले, संभाजी मेला अशी खोटी बातमी पसरवली. आपली दाढी मिशी काढून त्यांनी बैराग्याचा वेष घेतला आणि लपत छपत ते शिवनेरीवर परत आले. २-३ महिन्यानंतर शंभू बाळ हि परतले. शंभूला जवळ घेऊन जिजाऊ म्हणाल्या, "बाळ तुम्ही तर खूप च धाडसी झालात. बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आलात." त्यावर संभाजी म्हणाला "आऊ तुरी नाही, मिठाई देऊन आलो"

reference - "शूर शिवबा" - धीरज नवलखे