Friday, March 24, 2006

चाणक्य

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर “चाणक्य” नावाची मालिका यायची. ह्यावेळी भारतात गेलो होतो तेव्हा त्या मालिकेचा VCD संच आणला. हल्ली रोज रात्री त्याचा एक भाग तरी बघूनच झोपतो. खूपच चांगली मालिका आहे. प्रकाश द्विवेदींनी बराच अभ्यास केल्याचे जाणवते.

सध्या आम्ही अलेक्झांडरच्या आक्रमणाचा भाग बघतो आहे. तो बघताना जाणवलं, आपण १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य लढा म्हणतो, पण पहिला स्वातंत्र्यलढा तर त्याच्या जवळपास २००० वर्षांपूर्वी लढला गेला होता. अलेक्झांडरसमोर राज्यलालसेने आंधळ्या झालेल्या गांधारच्या आंभिराजाने समर्पण केले, शौर्याने लढूनही पुरु राजा हरला कारण त्याच्या मदतीला इतर कुठलेही राजे पुढे झाले नाही, ह्या पराभवानंतर पुरुनेदेखील भारत पादाक्रांत करण्यात अलेक्झांडरची मदत केली. आपले सैन्यबळ त्याला दिले. उत्तरेत अलेक्झांडरने धूमाकूळ घातला होता आणि त्याच्या प्रतिकार करण्याची ताकद एकाही राज्यात नव्हती. एकत्र येऊन प्रतिकार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. प्रत्येकाने स्वतंत्रपणे लढा दिला आणि हरले, सामूहिक प्रयत्नांची गरज होती पण तसे प्रयत्न अहंकारात बुडालेल्या ह्या शूर राजांनी केलेच नाहीत. पण हे सगळे सुरू असताना, तक्षशिलेचा एक सामान्य शिक्षक, आपल्याला काय त्याचे म्हणून शांत बसला नाही. त्याने संपूर्ण भारत एक राष्ट्र म्हणून संघटित करण्याचा विडा उचलला. लोकांच्या मनात राष्ट्राभिमान जागवला. स्वातंत्र्याचे महत्व त्यांना पटवून दिले. अंतर्गत संघर्षात आपण आपलाच घात कसा करतो आहोत ते राजांना दाखवून दिले. सामान्य शिक्षकाकडूनही उच्च ध्येयाने आणि प्रयत्नांनी काय घडू शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चाणक्य. त्याच्या ह्या प्रयत्नांनी संपूर्ण उत्तराचल प्रदेश पेटून उठला, यवनांना सळो की पळो करून सोडले ह्या ब्रह्मचारी स्वातंत्र्यसैनिकांनी. त्यांनी उत्तराचल यवनांच्या दास्यातून मुक्त केला. पण ह्या लढ्याचा साधा उल्लेखदेखील नाही आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात. चाणक्य म्हणजे “कुटील राजनीतिज्ञ” इतकीच माहिती होती मला. पुरू म्हणजे “मला राजासारखे वागव” असे अलेक्झांडरपुढे अभिमानाने सांगणारा राजा हेच ज्ञान मिळाले होते मला माझ्या पुस्तकातून. पण त्याच्या ह्या वागण्यासाठी त्याला धिक्कारणारी, ह्यापेक्षा तू अलेक्झांडरला “मला ह्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणा~या सैनिकासारखा वागव” असे उत्तर दिले असते तर माझ्या वडिलांचा मला जास्त अभिमान वाटला असता असे म्हणणारी कल्याणी मात्र त्या पुस्तकांच्या पानांतून कधी भेटलीच नाही. आजही आपण मराठी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, बिहारी, पंजाबी म्हणून ओळख करून देतो स्वतःची. ऐक्य नाही आहे आपल्यातच. पण ह्या गोष्टीचा धोका ओळखून २००० वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने राष्ट्र उभारणीचे कार्य हाती घेतले होते आणि ते तडीलाही नेले त्याचा मात्र साधा उल्लेखही नाही आपल्या इतिहासात. प्रत्येकवेळी ती मालिका बघताना वाटत रहातं, आजही अगदी तशीच परिस्थिती आहे, राष्ट्र संघटित करणा~या चाणक्याची आजही गरज आहे, पण असे निःस्वार्थी, द्रष्टे लोक राष्ट्राच्या इतिहासात क्वचितच जन्माला येतात. त्यांच्यात होते ते सामर्थ्य आपल्यात नाही, तसा स्वार्थत्याग करण्याची आपली तयारीही नाही, पण निदान आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याची जबाबदारी तरी निभावू शकतोच की आपण.

2 comments:

Vishal K said...

'चाणक्य' लहान असताना पाहिल्यामुळे आता फारसं काही आठवत नाही. पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा आहे. या लेखामुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे.
छान लेख. आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत.

Anonymous said...

hahi lekh avadala. chanakya malikebaddal kahi mahit nahi. ata ticha VCD sanch shodhayala hava.