Thursday, March 02, 2006

सख्या रे...

मला वाटतं... चालत राहावे तुझा हात धरून, न संपणा~या वाटेवर, क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत. वाटेत खाच-खळगे येतील, पायाला काटे रुततील, थकव्यामुळे पाऊल उचलणेदेखील अवघड वाटेल. पण तेव्हा तू असशील सावरायला. कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसेल, कधी तारकांची रांगोळी, पाखरांचे उन्मुक्त थवे नि कधी जलधारा आणि विजांची एकत्र आतिषबाजी आणि हे सगळे तुझ्या खांद्यावर डोकं टेकून मी बघेन. आपण भांडू कधी कधी, चिडूदेखील एकमेकांवर, मी म्हणेनसुद्धा की "तुला माझी काही किंमतच नाही मुळी", पण तू मला जवळ घेशील आणि क्षणात सगळे वाद विरून जातील तुझ्या आश्वस्त मिठीत. कधी वसंत येईल आणि रंगात न्हालेला निसर्ग तुला मोहून टाकेल, मग सुरेल शीळ घालत तू मला जवळ ओढशील आणि मी लटकंच रागावत तुझ्या कुशीत शिरेन. कधी दिवस रंगून येतील ओल्या मेंदीत, तर कधी काळवंडून येतील ग्रहणानं, पण तरिही असंच चालत रहायचं आहे मला.. तुझ्याबरोबर...तुझा हात धरून...क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत आणि त्याच्या पल्याडदेखील...

4 comments:

Anonymous said...

khoop Surekh

मनोगते said...

धन्यवाद

अभिजीत दाते said...

सहजसुंदर हळवे तरीही खरे..

Anonymous said...

Khup sundar aahe hi feeling